Shivaji The Great King
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्रमाला भाग -५
- यह तो पत्थरों की बौछार है!
बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी
महाराज आपल्या मावळ्यांनिशी पसार झाले. ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी
खरं म्हणजे साफ कापली जाणार होती. भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता.
पण बाजी जेध्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा
बचावले. ते ही गडावर आले. रात्रीची वेळ , पूर्ण विजय नव्हे , पण एक यशस्वी
धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती.
महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला हुकुम दिला
की , पुरंदर गडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीग
जागोजागी गोळा करून ठेवा. मावळे त्वरित कामाला लागले. डोंगरावर धोंड्यांना
काय तोटा! उत्तर बाजूच्या तटावर धोंड्याचे लहानमोठे ढिगारे घडीभरात
जमले.
महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले , 'आता मार बसल्यामुळे
चिडलेला तो फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून
येईल. तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कुणीही त्याच्यावर
कसलाही मारा करू नका. येऊ द्यात त्याला वर. आम्ही इशारत
करू अन् मग तुम्ही शत्रूवर या मोठ्यामोठ्या धोंड्यांचा मारा करा. '
सोप्पं काम. स्वस्थ काम. शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर
दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं
नव्हत. युद्ध साहित्यही कमी. मावळी सैन्यही कमी. त्यावर महाराजांनी ही दगड
धोड्यांची लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा. पसाभर
धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे , सह्यादीतील हे
दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते.
महाराजांचा अंदाज अचूक ठरला. उजाडल्या उजाडल्या फत्तेखान आपलं
सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला. तुफान , प्रचंड
पुरंदर त्याच्यासमोर उभा होता. आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि
त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पाय उतार होऊन एकदम
एल्गार करण्याचा हुकुम दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम हल्ला. शाही फौज
एकदम पुरंदरावर तुटून पडली. त्यांच्या युद्धगर्जना दणाणू लागल्या. पुरंदरगड
आणि पुरंदरगडी एकदम शांत होते. चिडीचिप्प. ते दडलेले होते. फत्तेखानाची
फौज गडावर धावून निघाली होती. गडाच्या निम्यापर्यंत चढलीही.
अन् ऐन टप्प्यात शत्रू आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना
इशारा केला. अन् गर्जना सुरू झाल्या. शिंगे धुत्कारू लागली. अन् मग ते
लहानमोठे धोंडे गडावरून उतारावर धाड् धाड् धाड् उड्या घेत फत्तेखानच्या
सैन्यावर तुटून पडले. एका का दोन! पाउसच. शाही सैन्य तो दगडांचा
वर्षाव पाहून चकीतच झालं. थडाथडा मार बसू लागला. कुणी मेलं , फारजण जखमी
होऊ लागले. हा मारा सोसण्याच्या पलिकडचा होता.
फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता. तो थक्कच झाला. अन् म्हणाला , 'यह तो पत्थरों की बौछार है! '
आता ? मावळ्यांना चेव आला होता. केवळ दगड धोंड्यांची
पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिम हैराण केला होता. गनिम आरडत ओरडत तोंड
फिरवून गडाच्या पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला होता. उड्या
मारीत, पडत, घसरत, दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं गेलं
होतं. जणू वादळातला पालापाचोळा. या फत्तेखानाची आता फळी फुटली होती.
महाराज आपल्या सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले. अखेर
फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला. येथून सासवड फक्त १० कि. मी.वर.
गनिम सासवड गावात आश्रयाला घुसला. मावळ्यांनी पाठलाग करून
त्यांना झोडपून काढले. फत्तेखान कसाबसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता.
विजापूरच्या दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाचवेळी पार
उधळून लावलं होतं.
फत्तेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानशा
सैन्यानिशी कमीतकमी वेळात , कमीत कमी युद्धसाहित्यानिशी , पूर्ण पराभव केला
होता. कोणची ही जादू ? कुणाचा हा चमत्कार ? हा
गनिमीकाव्याच्या शक्तीयुक्तीचा परिणाम ,जादू ,चमत्कार विचारपूर्वक आपल्या
लहानशा शक्तिनिशी प्रचंड शाहीशक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांचे चिंतन
इथं दिसून येतं.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
No comments:
Post a Comment